Thursday, November 25, 2021

भारतीय पुरस्कार, Indian Awards

 नमस्कार मित्रांनो,
आज आपण अतिशय मनोरंजक आणि आपणा सर्वांचे कुतूहल वाढवणारी आणि त्याच वेळी आपली मान अभिमानाने उंचावणारी अशी अतिशय प्रेरणादायी माहिती वाचूया. वरील मथळा वाचून एका क्षणातच तुमच्या लक्षात आले असेल की, आज आपण आपल्या भारत सरकार तर्फे विविध क्षेत्रात मौल्यवान असे काम करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांना दिले जाणारे विविध पुरस्कार कोणते आहेत आणि ते कोण कोणत्या क्षेत्रात काम केल्यानंतर दिले जातात आणि त्यांची सुरुवात कधी नेमकी कधी झाली याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, जो कोणीही व्यक्ती आपल्या तनमनाने आपल्या भारत मातेची सेवा करतो आणि जगाच्या पाठीवर आपल्या भारत मातेचे नावलौकिक करतो अशा महान वीरपुत्रांचा जयजयकार करणे हे, त्यांचे मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यावश्यकच बनते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय संघराज्यात, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात, मग ते कोणतेही क्षेत्र असो... कला, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य, विज्ञान आणि इतरही अनेक क्षेत्रात अतिशय भरीव आणि अर्थपूर्ण योगदान देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महान सुपुत्रांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविले जाते. तर आज आपण अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप याबद्दल अतिशय उपयोगी अशी  माहिती पाहूया....

सर्वप्रथम आपण भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल माहिती घेऊया.....


1) भारतरत्न : भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आपल्या देशासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी देशासाठी सर्व आयुष्य वाहून घेतलेले असते. या पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी झाली. सेवा ,कला, साहित्य, विज्ञान ,क्रीडा,मानव विकास, विश्वशांती इत्यादी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला हा पुरस्कार जिवंत व्यक्तींना बहाल करण्याचे नियोजन होते पण 1955 साली त्यात सुधारणा करून मृत्यूनंतरही मरणोत्तर हा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त लोकांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आलेले आहे. यातील तीन व्यक्ती ह्या परदेशी आहेत. लाल बहादूर शास्त्री, के. कामराज, आचार्य विनोबा भावे, एम. जी. रामचंद्रन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बोरदोलोई, मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम 1954 साली डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी व डॉ. चंद्रशेखर वेंकटरमन यांना भारतरत्न पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ.  राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आला. मदर टेरेसा, अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला या तीन परदेशी व्यक्तींना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरने मिळवलेला आहे. आता या पुरस्काराचे स्वरूप कसे आहे आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना कोणकोणत्या सुविधा मिळतात ते शोधून काढायची जबाबदारी मात्र तुमची बर का....

--------------------------------------------------------------------------------

2) पद्म पुरस्कार....
या पुरस्कारांचीही स्थापना 1954 साली करण्यात आली. प्रामुख्याने कला, शिक्षण, साहित्य, विज्ञान, अभिनय, समाजसेवा, आरोग्य, कारखानदारी इत्यादी क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी प्रदान केले जातात.
पद्म पुरस्कार तीन प्रकारचे आहेत...1) पद्मविभूषण, 2) पद्मभूषण आणि 3) पद्मश्री
(1) पद्मविभूषण : हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
याचे स्वरूप म्हणजे एक पदक आणि एक प्रशस्तीपत्र असे आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 230 पेक्षा जास्त लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविण्यात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या उल्लेखनीय आहे. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
(2) पद्मभूषण - हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याचीही स्थापना 1954 साली झाली.
(3) पद्मश्री - हा भारत सरकार तर्फे दिला जाणारा चौथा सर्वात मोठा पुरस्कार आहे. दर वर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी हे पुरस्कार नाकारलेले आहेत.

-------------------------------------------------------------------------------

शौर्य पुरस्कार.....


भारतीय सैनिकांना, त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल, त्यांच्या साहसाचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार बहाल केले जातात... या पुरस्कारांची स्थापना 26 जानेवारी 1950 या दिवशी करण्यात आली. शौर्य पुरस्कारांचे दोन विभाग पडले जातात. एक प्रत्यक्ष युद्धावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार पुरस्कार आणि दुसरे शांततेच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार... चला तर मग आपण सर्वप्रथम युद्धकाळात दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांची माहिती घेऊया....
(1) परमवीर चक्र- हे भारतातील सर्वोच्च "Highest Military Award"  आहे. भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 21 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मेजर सोमनाथ शर्मा हे परमवीर चक्र मिळविणारे पहिले भारतीय होते. 14 वेळा हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला . भारतीय सैन्यातील वीस जणांनी आणि भारतीय वायुसेनेतील एका अधिकाऱ्याला हा पुरस्कार मिळाला आहे.


(2) महावीर चक्र - हा युद्ध काळात दिला जाणार
 दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. जमिनीवरील युद्धात, आकाशातील युद्धात किंवा समुद्रातील युद्धात , या तिन्ही प्रकारच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. जिवंत असताना आणि मरणोत्तर हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 219 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यात 74 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला.
(3) वीर चक्र : हा भारतीय सैनिकांना प्रत्यक्ष युद्ध काळात दाखवलेल्या अतुलनीय सहसा बद्दल दिला जाणारा परमवीर चक्र आणि महावीर चक्र यानंतरचा तिसरा सर्वात मोठा सन्मान आहे. सर्वप्रथम 1947 साली हा पुरस्कार देण्यात आला. चला तर मग आत्तापर्यंत किती भारतीय वीर योद्ध्यांना हा पुरस्कार मिळाला याची माहिती सांगा पाहू.... यानंतर तुम्ही  शांतता काळात दिल्या जाणाऱ्या खालील शौर्य पुरस्कारांची माहिती गोळा करा आणि लक्षात ठेवा.....
1 अशोक चक्र
2 कीर्ती चक्र
3 शौर्य चक्र

-------------------------------------------------------------------------------

साहित्य क्षेत्रात दिले जाणारे पुरस्कार...
आता आपण भारतीय साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिले जाणारे पुरस्कार पाहूया. भारतात एकापेक्षा एक सरस अशी लेखकांची परंपरा आहे. भारतीय साहित्य क्षेत्र अतिशय समृद्ध आणि विविधांगी आहे. भारतात वेगवेगळ्या भाषातून अतिशय वाचनीय असे लेखन झालेले आहे. चला तर मग आज आपण भारतीय साहित्य क्षेत्रासाठी चे कोणते पुरस्कार आहेत ते माहिती करून घेऊया....
(1) ज्ञानपीठ पुरस्कार  : हा आपल्या देशातील साहित्यक्षेत्रात दिला जाणारा सर्वात मोठा आणि सर्वात जुना पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1961 साली झाली. हा पुरस्कार केवळ भारतीय लेखकांना दिला जातो. हा पुरस्कार मिळविण्यासाठी लेखन हे केवळ प्रमाणीत भारतीय भाषा आणि इंग्रजी मध्येच असले पाहिजे अशी अट आहे. हा पुरस्कार केवळ जिवंत लेखकांना दिला जातो. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. सर्वप्रथम 1965 साली मलयाळम साहित्यिक
श्री गोविंद शंकर कुरूप यांना त्यांच्या "ओडोक्वुघल" या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Learn to Speak English

Let me play. मला खेळू दे Let me go मला जाऊ दे. Let me eat. मला खाऊ दे. Let me study. मला अभ्यास करू दे. Let me drink milk. मला दूध पिऊ दे. L...